भोकरदन (प्रतिनिधी): आगामी खरीप हंगाम तोंडावर आला असताना, शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी अत्यंत आवश्यक असलेले डिझेल कॅन, टाकी किंवा प्लास्टिक कंटेनरमध्ये देण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे ठप्प झाली असून, हा नियम शिथिल करून शेतकऱ्यांना कॅन व टाकीमध्ये डिझेल देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भोकरदन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष त्र्यंबक बंडूजी पाबळे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
उपविभागीय अधिकारी आणि भोकरदन पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात काँग्रेस कमिटीने म्हटले आहे की, सध्या शेतीचा खरीप हंगाम सुरू होत आहे. शेतीची मशागत आणि पेरणीपूर्व कामे पूर्णपणे डिझेलवर चालणाऱ्या यंत्रांवर अवलंबून आहेत. मात्र, जालना जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप चालकांना कोणत्याही व्यक्तीस कॅन किंवा टाकीमध्ये इंधन न देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा थेट फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसत आहे. शेतात ट्रॅक्टर किंवा इतर यंत्रांमध्ये डिझेल संपल्यास थेट पंप गाठणे शेतकऱ्यांना अशक्य असते. अशा वेळी कॅन किंवा टाकीत डिझेल न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
एकीकडे डिझेलचे भाव वाढल्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे, त्यातच आता इंधन मिळण्यात अडचणी येत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून जिल्हाभरातील डिझेलचे भाव कमी करावेत आणि शेतकऱ्यांना पंपावर कॅन व टाकीमध्ये डिझेल देण्याचे आदेश पंप चालकांना द्यावेत, अशी मागणीचे निवेदन मा उपविभागीय अधिकारी वी सरवनन यांच्या प्रतिनिधींना देण्यात आले.
या निवेदनावर भोकरदन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष त्र्यंबक पाबळे, जिल्हा उपाध्यक्ष श्रावणकुमार आक्से, जिल्हा का. सचिव सोपान सपकाळ, शहराध्यक्ष अ.सत्तार शेख, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष एजाज पठाण, नगरसेवक जहीर खान कुरेशी, गटनेते रमेश जाधव, माजी उपनगराध्यक्ष इरफान सिद्धीकी,शेख रिझवान, गुडू कादरी, शेख रफीक मजीद, शेख अतीक, पंजाबराव देशमुख, विष्णु भालेराव,जुनेद इब्राहीम शेख, विश्वास वाघ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment