स्व.ॲड.एस. डी. देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे पेरजापुर येथे उद्घघाटन
कमलकिशोर जोगदंडे
भोकरदन स्व. ॲड. एस. डी. देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन मौजे पेरजापुर येथे "डिजिटल भारतासाठी युवक " या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवरांकडुन प्रतिमापुजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शिवाजी वरपे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात शिबिराच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करत शिबिरादरम्यान राबविल्या जाणाऱ्या विविध व्याख्याने व उपक्रमांची माहिती दिली. या सर्व उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन ग्रामस्थांसह शिबिरार्थींना केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी औपचारिक शिक्षणासोबतच चार भिंतींच्या बाहेरील समाजशिक्षण आवश्यक असते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केला जाणाऱ्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून गावखेडी, तेथील समाजकारण, अर्थकारण समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. अशा अनुभवातून विद्यार्थी सामाजिक दृष्ट्या समृद्ध होतात. शिबिरात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमधून विद्यार्थी स्वयंशिस्त, समाजकार्य करण्याची संधी व प्रेरणा, वक्तशीरपणा,नीटनेटकेपणा व समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व अशा अनेक गुणांनी समृद्ध होतात. असे सुजाण, सुसंस्कृत व जबाबदार नागरिक राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे घडविले जातात असे मत शिबीर उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जेईएस महाविद्यालयाचे प्रा. डॉ.लक्ष्मीकांत शिंदे सर यांनी व्यक्त केले.
डॉ. शिंदे सर यांनी उदबोधन करताना असेही म्हटले की, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याची ताकद युवाशक्तीमध्ये असून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक स्व-विकासातून समाजाचा व पर्यायाने देशाचा विकास साधण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी इतर प्रलोभनांपासून दूर राहत आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेत व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून असलेले जेईएस महाविद्यालयाचे प्रा. डॉ.गणेश रोकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की आजच्या प्रगतशील युगात मोबाईल ही गरज बनली असली तरी त्याचा वापर गरजेनुसार व मर्यादित करणे आवश्यक आहे असे मत मांडत शिबिराच्या यशस्वीतेसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सचिव प्रा. रणवीरसिंह देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महत्त्व विशद करत या शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य प्रकारे सदुपयोग करून गावाच्या प्रगतीसाठी व स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पेरजापुर ग्रामस्थांनी शिबिर घेण्याची संधी दिल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य श्री. एस. एस. गाढे यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी शिबिरातील प्रत्येक उपक्रमात प्रामाणिकपणे सहभाग घेत शिबिरादरम्यान त्यांच्यामध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांचे निरीक्षण करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे शिबिर ही विचारांना कृतीची जोड देण्याची सुवर्णसंधी असून अशा संधीचा विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पुरेपूर फायदा करून घ्यावा असे मत व्यक्त केले.
पेरजापुर गावचे तरुण व उच्च शिक्षित सरपंच श्री.किशोर जाधव यांनी देखील आपल्या मनोगतातुन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महत्त्व स्वनुभवासह विशद केले.
या कार्यक्रमास पेरजापुर जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्हि आर शेळके सर, साहेबराव पा. बुरंगे, राजाराम पा. जाधव, लक्ष्मण पा. बुरंगे, बाबुराव सोनटक्के, विष्णू पा. तळेकर,
केशवराव पा. तळेकर, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सल्लागार प्रा. व्हि. एल. जाधव सहकार्यक्रमाधिकारी प्रा. अरुण तळेकर , प्रा. रामेश्वर पाबळे, प्रा. एस. एस. जाधव, प्रा. पि. एस. तळेकर, प्रा. जी. बी. सोनटक्के, प्रा. एस. बी. जोशी, प्रा. आर. एस. चौतमल, प्रा. एस. ए. मुळे , प्रा. एस. टी. मेल्ढे, श्री. योगेश देवडे यांसह बहुसंख्य ग्रामस्थ व स्वयंसेवक उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामेश्वर पाबळे सर यांनी केले.